श्री रंगनाथ स्वामी यांच्या विषयी
श्री रंगनाथ स्वामी हे समर्थ विरचित दास पंचायतनापैकी एक समर्थसंत आहेत. १) श्री रामदास स्वामी (सज्जनगड ) २) श्री जयरामस्वामी (वडगाव) ३) श्री रंगनाथ स्वामी (निगडी ) ४) आनंदमूर्ती (ब्रह्यनाळ ) ५) श्री केशवस्वामी (भागानगर , हैद्राबाद ) असे समर्थ व शिवकालीन दास पंचायतन आहे.श्री रंगनाथ स्वामी यांचा जन्म रविवार मिती मार्गशीर्ष शु // १० // शके १५३४ नाझरे, ता. सांगोला, जि. सोलापूर येथे झाला. श्री. बोपाजीपंत देशपांडे व सौ. बयाबाई यांना तीन अपत्ये झाली. त्यापैकी क्रमांक दोनचे चिरंजीव श्री रंगनाथ स्वामी होते.श्री रंगनाथ स्वामी यांचे कनिष्ठ बंधू विठ्ठलस्वामी हे निगडी येथे आले. त्यांचे गोसावी मंडळी हे वंशज आहेत.लहानपणी वयाच्या बाराव्या वर्षी मुंज झाल्याबरोबर रंगनाथ स्वामींनी हिमालयात प्रयाण केले. तेथे त्यांनी बद्रीधाम सध्याची मानाबाॅर्डर येथे व्यास गुंफेमध्ये राहून ध्यानधारणा व अध्यात्मज्ञान मिळविले. सतत अठरा वर्षे तपश्चर्या केलेनंतर त्यांना व्याघ्ररुपामध्ये श्री गुरुदत्तात्रय यांनी दर्शन दिले, व समाजसेवा करण्याची आज्ञा दिली व राजयोगाचा वर दिला.महाराज दक्षिण भारताकडे प्रवासास निघाले असताना हिमाचल प्रदेशातील टिहरी संस्थानिकांनी त्यांना राजयोगाचा भाग म्हणून भरजरी वस्त्रे, महावस्त्रे, आभूषणे, भाला, तलवार व मनोहर नावाचा तेजस्वी अश्व प्रदान केला. त्यावेळेपासून महाराज घोडयावरून प्रवास करीत असत. मनोहर घोडा ज्यावेळी महाराजांची आज्ञा मानणार नाही तो परिसर आपले कार्यक्षेत्र करावे असा दृष्टांत महाराजांना झाला होता . येणेप्रमाणे हा अश्व निर्गुणपूर म्हणजे निगडी येथे आल्यावर तेथे मनोहर अश्वाने त्यांची आज्ञा मानली नाही . त्याचा खुर एका विशाल शिळेमध्ये रुतला. ही आज्ञा समजून महाराजांनी निगडी ही कर्मभूमी निवडली. ही विशाल शिळा आजही पहावयास मिळते. त्याचे स्मारक येथे केलेले आहे.निगडी येथे वास्तव्य करून महाराजांनी त्यावेळचे दास पंचायतनामध्ये प्रवेश केला व शिवाजी महाराजांचे धर्मकार्यास वाहून घेतले.श्री रंगनाथ स्वामी हे उत्तम कीर्तनकार असल्यामुळे त्या माध्यमातून ते धर्मकार्य, लोकजागृती करून देशसेवा, समाजसेवा करीत होते. त्यांचे उत्तरादायित्त्व म्हणून आजही निगडीकर मंडळी अनेक ठिकाणी कीर्तन, प्रवचन, भजन करून समाज प्रभोधनाचे कार्य करतात.

